कुलथा येथील प्रकरणात महसूलसह खनिकर्म अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा

118
कुलथा येथील प्रकरणात महसूलसह खनिकर्म अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा
रिपाइं (आठवले गट) महिला आघाडी जिल्हाध्यक्ष पुष्पा मोरे यांची मागणी : वाळू तस्करांकडून सरपंच, तंमुस अध्यक्षाला मारहाण प्रकरण
 
चंद्रपुर/महाराष्ट्र

दि . 21 डिसेंबर 2023

रिपोर्टर :- रमाकांत यादव जिल्हा प्रतिनिधि ग्लोबल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
सविस्तर बातमी:-चंद्रपूर : गोंडपिपरी तालुक्यातील कुलथा रेती घाटावरून मोठ्या प्रमाणात वाळू तस्करी सुरू आहे. या वाळू तस्करीला तारडाचे सरपंच तरुण उमरे, तंमुस अध्यक्ष चंद्रशेखर लखमापुरे एका महिला ग्रा.पं.सदस्याने विरोध केल्याने वाळू तस्करांनी या तिघांवरही प्राणघातक हल्ला करून जखमी केले. या प्रकरणात शिवसेना (उबाठा) वाहतूक सेनेचा जिल्हाध्यक्ष स्वप्नील काशीकरसह काही जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. मात्र, या प्रकरणाला गोंडपिपरीचे एसडीओ, तहसीलदार, अतिरिक्त जिल्हाधिकारी देशपांडे आणि खनिकर्म अधिकारी नैताम तेवढेच जबाबदार असून, या सर्व अधिकाऱ्यांना या हल्ल्याप्रकरणी जबाबदार ठरवून गुन्हा दाखल करण्याची मागणी रिपाइं (आठवले गट) महिला आघाडी जिल्हाध्यक्ष पुष्पा मोरे यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.
गोंडपिपरी तालुक्यातील कुलथा घाटावरून शासनाचे नियम डावलून रेती उत्खनन सुरू आहे. रेतीघाटधारक अक्षय चांदेकर हे पोकलेन, जेसीबी मशीने रेतीघाट पोखरत आहेत. दररोज रेती तस्करीच्या वाहतुकीमुळे तारडा गाववासीयांची झोप उडाली असून, तारडाचे सरपंच तरुण गंगाराम उमरे, तंमुस अध्यक्ष चंद्रशेखर लखमापुरे आणि एका महिला ग्रामपंचायत सदस्यांने नदीपात्राकडे धाव धेत रेती उत्खननाला विरोध केला. यावेळी या तिघांवरही अक्षय चांदेकर आणि त्याच्या गुंडांनी प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्याचा मास्टर माइंड शिवसेना वाहतूक सेनेचा जिल्हाध्यक्ष स्वप्नील काशीकर असून, आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काही जणांना अटक करण्यात आली तर काशीकर हा फरार असल्याचे पोलीस सांगत आहेत. परंतु, हा हल्ला पूर्वनियोजित असून, रेतीघाटधारक अक्षय चांदेकर यांनी महसूलचे अधिकारी, जिल्हा खनिकर्म अधिकारी आणि अतिरिक्त जिल्हाधिकारी देशपांडे यांना हाताशी धरून हा हल्ला केल्याचा आरोप पुष्पा मोरे यांनी केला आहे.
चांदेकर यांनी परवानगी मिळालेल्या क्षमतेपेक्षा दहा पट अधिक ब्रासरेतीचे उत्खनन केले आहे. रेती घाटावरील सीसीटीव्ही फूटेज आणि स्टॉक यार्ड, जीपीएस ट्रेकिंग याची चौकशी केल्यास या घाटावरील वाळूचोरीचे मोठे गौडबंगाल उजेडात येणार आहे. परंतु, अनेक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरेच लावण्यात आले नाही. त्यामुळे महसूल अधिकाऱ्यांच्या मूकसंमतीनेचे रेतीघाट धारकाकडून रेतीघाट पोकलेन आणि जेसीबीने पोखरला जात असल्याचा आरोप मोरे यांनी यावेळी केला. जिल्ह्यातील रेतीघाटांवरून मोठ्या प्रमाणात अवैधपणे रेतीचे उत्खनन सुरू असून, गुन्हेगारी वाढत आहे. अधिकाऱ्यांच्या पाठबळामुळेच कुलथा घाटावरील घटना घडली असून, या महसूल अधिकाऱ्यांवर ॲट्रोसिटी ॲक्टअन्वये गुन्हे दाखल करण्यात यावे, तसेच सरपंच आणि तंमुस अध्यक्षांवर प्राणघातक हल्ला प्रकरणातील फरार आरोपींना तत्काळ अटक करण्याची मागणी मोरे यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.