कॅन्सरमुक्त महाराष्ट्र’ अभियान हे खऱ्या अर्थाने पुण्य कर्म : आ.सुधीर मुनगंटीवार

67

कॅन्सरमुक्त महाराष्ट्र’ अभियान हे खऱ्या अर्थाने पुण्य कर्म : आ.सुधीर मुनगंटीवार

भाजपाच्या जैन प्रकोष्ठ चे भरभरून कौतुक

चंद्रपूर जिल्ह्यातील आरोग्य सेवा सक्षम करण्यासाठी सर्वंकष प्रयत्न करणार

चंद्रपुर/महाराष्ट्र

दि: 26 जुलाई 2022 

चंद्रपूर: पाश्चात्य आणि इतर संस्कृतीचा आपल्या मनावर अजुनही पगडा असून भारतीय संस्कृतीचे ज्ञान आणि तत्व अफाट आहे; सिकंदर रिकाम्या हाताने आला आणि रिकाम्या हाताने गेला हेच लोकांच्या मनावर बिंबविल्या गेले, परंतु आपल्या संस्कृतीनुसार शरीर खाली हाताने येईल व जाईलही पण आत्मा पूर्वसंचित, संस्कार घेऊन येतो आणि पाप पुण्यकर्म घेउन जातो; हे पुण्यकर्मच माणसाच्या कामाला येतं. भाजपच्या जैन प्रकोष्ठ पदाधिकारी आणि सोबतचे डॉक्टर याच पुण्यकर्माचे धनी आहेत असे भावपूर्ण उद्गार माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी काढले.

 

भारतीय जनता पक्षाच्या जैन प्रकोष्ठ तर्फे राज्यातील १११ वे कॅन्सर रोग निदान शिबिर आयोजित करण्यात आले, त्या शिबिराचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते.

 

आ. सुधीर मुनगंटीवार पुढे म्हणाले, कर्करोग जगासह भारतापुढील एक प्रमुख समस्या आहे. आजही या जीवघेण्या आजाराला भारतातील असंख्य लोक बळी पडतात. उशिरा निदान होणे, निदान झाल्यानंतरही उपचारासाठी खर्च करण्याची आर्थिक क्षमता नसल्याने अनेक कर्करुग्णांना प्राण गमवावे लागतात. २१ शतकात वाटचाल करणाऱ्या, विज्ञानवादी जगाला कॅन्सर वर मात्र योग्य उपाय शोधता आला नाही हे दुर्दैव आहे; पण जनसामान्यांच्या या वेदना ओळखून आणि सामाजिक बांधिलकीची जाण ठेवत भाजपच्या जैन प्रकोष्ठ ने “कॅन्सरमुक्त महाराष्ट्र” हा विशेष पुण्य उपक्रम सुरू केल्याबद्दल त्यांचे मनापासून कौतुक वाटते; संवेदनशीलतेचा आदर्श प्रस्थापित केला आहे असेही ते म्हणाले.

 

जनहिताच्या पवित्र भावनेतून या उपक्रमास प्रारंभ केला. राज्याच्या जैन प्रकोष्ठ ने आयोजित केलेल्या या अभियानाचे उद्घाटन सौ अमृताताई फडणवीस यांच्या हस्ते झाले, १०० व्या शिबिराचे उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांनी केले तर १११ वें शिबिर उद्घटित करण्याचा योग मला आला , असंही ते म्हणाले.

आरोग्य सेवा हे मानसिक समाधान देणारे क्षेत्र आहे, पैसा कमविण्याला जर मर्यादा असू शकत नाहीत तर पुण्य कमविण्यासाठी कंजुषी नको: असे म्हणत चंद्रपूर मध्ये भव्य कॅन्सर हॉस्पिटल व्हावे यासाठी मी पुढाकर घेतला आहे.२०१८-२०१९ मध्ये ट्रस्ट बनविले, सरकार गेले आणि कामाची गती मंदावली आता मात्र वेगाने हे काम पूर्ण होईल, येत्या २६ जानेवारी पर्यंत पूर्ण करण्याचा मानस आहे. अडीच वर्षानंतर सरकार आल्याबरोबर प्रथम मी चंद्रपूर च्या आरोग्य स्थितीचा आढावा घेणारी बैठक घेतली. ग्रामीण आरोग्य व्यवस्था, अत्याधुनिक सोयी, तज्ञ डॉक्टर्स उपलबध करून देण्यासाठी सूचना दिल्या. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुसज्ज असावे अशी इच्छा आहे, त्यासाठी उत्तम डिझाइन तयार केलें. मुंबईच्या फोर्टिस हॉस्पिटल शी करार करून बालकांसाठी हृदयरोग तपासणी शिबिर घेतले, त्यातील २५ बालकांवर आता केंद्र सरकारच्या सहकार्याने मोफत शस्त्रक्रिया होणारं आहेत. शेवटी हेच पुण्यसंचित तुम्हाला समाधान देतं याची मला नम्र जाणीव आहे असंही आ. सुधीर मुनगंटीवार शेवटी म्हणाले.

 

राज्यात सर्वत्र आपण काम करत आहात याचा अभिमान आहेच; परंतु चंद्रपूर जिल्ह्यातील रुग्णांकरीता शिबीर आयोजित करण्याचा निश्चय केला याबद्दल त्यांनी भाजपच्या जैन प्रकोष्ठचे प्रदेशाध्यक्ष संदीप भंडारी, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स चे अध्यक्ष ललित गांधी व त्यांच्या सहकाऱ्यांचे आभार मानले.

 

मंचावर संदीप भंडारी, ललित गांधी, मनोज सिंघवी, महेंद्र मंडलेचा, निर्भय कटारिया, भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष डॉ मंगेश गुलवाडे, कोषाध्यक्ष प्रकाश धारणे, जैन प्रकोष्ठचे जिल्हाध्यक्ष हेमंत सिंघवी, महिला आघाडी अध्यक्षा अर्चना मुनोत, वंदना गोलेछा, डॉ सुशील मुंधडा, फेम बाबू भंडारी, यांच्यासह जैन समाजातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.